Sunday, October 11, 2009

त्या सोनेरी क्षणी...

प्रेयसीला थरथरणार्‍या हाताने गुलाबाचे फुल देणारा प्रियकर
जेव्हा तिला सांगतो की,'माझ तुझ्यावर प्रेम आहे'...
त्यावेळी सर्व जग त्यांच्यासाठी थांबतं..क्षणभर थबकतं,
तिचा होकार ऐकण्यासाठी उत्सुकतेने कान टवकारतं
आणि तिच्या त्या लाजून लाल झालेल्या
गालांना लपवत ती होकार देते,
त्या सोनेरी क्षणी....
तेही गालातल्या गालात हसतं,
प्रियकराच्या आनंदात सामील होतं
हळूच स्वतःच्याही भूतकाळात हरवतं
कुणीतरी आपल्या साठी आहे...अन
आपण कुणासाठी तरी आहोत...
ही भावनाच फार सुंदर आहे...
खोटं वाटतं तर ,
समुद्राकडे धाव घेणार्‍या नदीला विचारा
ढगातून थेट जमिनी कडे स्वतःला
झोकून देणार्‍या जलबिंदूंना विचारा
अगदीच नाही तर सूर्याला फक्त बघण्यासाठी
मान वेळावणार्‍या सूर्यफुलाला विचारा
कुणीही कुणावरही प्रेम करू नका...
पण जेव्हा कराल आवेगाने प्रेम करा
बेधुंद प्रेम करा

चार पावलं

चार पावलं आपण,सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर,कुठवर जुळतात पाहू

अर्थात,जमत असेल तर चल,मी आग्रह करणार नाही
'आज तरी तुला यावंच लागेल',असा हट्टही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा,व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं,सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं,हे सांगता येत नाही
चारचौघांना विचारून कुणी,हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं,त्याच धुंदीत प्रपोज केलं,
जवळ अशी कधी नव्हतीसचं...प्रपोजनं आणखी दूर नेलं

दुरावलीस हे वाईट झालं,पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो,एवढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे...झालं गेलं विसरून जा,मागे न पाहता चालत रहा
मला विसर अस मी म्हणणार नाही,पण तू तो प्रयत्न करून पहा.....

...थांब....इथून पुढे मला,एकट्यालाच जायचयं,
पण धन्यवाद,तू इथवर आलीस....

सारं आयुष्य नसलीस,तरी
चार पावलं माझी झालीस...
चार पावलं माझी झालीस......